पंढरपूर-शेगाव (भूम परंडा मार्गे) नवीन रेल्वेमार्ग मंजूर करा खा ओमराजे निंबाळकर यांची लोकसभेत आक्रमक मागणी:

SHARE:

 नवी दिल्ली: धाराशिव लोकसभेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी लोकसभेत अत्यंत महत्त्वाचा आणि जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न प्रभावीपणे उपस्थित करत पंढरपूर-शेगाव  नवीन रेल्वेमार्ग मंजूर करण्याची जोरदार मागणी केली. सोलापूर, धाराशिव आणि बुलढाणा या तीन जिल्ह्यांच्या दृष्टीने हा रेल्वेमार्ग अत्यंत महत्त्वाचा असून, तो महाराष्ट्रातील लाखो भाविकांच्या श्रद्धेशी निगडित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

          लोकसभेत बोलताना खासदार निंबाळकर यांनी नमूद केले की, पंढरपूर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आणि शेगाव गजानन महाराज मंदिर ही महाराष्ट्रातील दोन प्रमुख तीर्थक्षेत्रे असून, येथे दरवर्षी कोट्यवधी भाविक दर्शनासाठी येतात. मात्र, या दोन्ही तीर्थक्षेत्रांना थेट रेल्वेने जोडणारा मार्ग नसल्याने भाविकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. प्रस्तावित रेल्वेमार्ग पूर्ण झाल्यास प्रवास अधिक सुलभ, जलद आणि सुरक्षित होईल, मराठवाडा विदर्भ व पश्चिम महाराष्ट्र रेल्वे मार्गाने थेट जोडला जाईल. ज्याचा फायदा सामान्य नागरिक आणि भाविकांना होणार आहे.

          खासदार निंबाळकर यांनी या रेल्वेमार्गाचे महत्त्व केवळ धार्मिक पर्यटनापुरते मर्यादित नसून, तो सोलापूर, धाराशिव आणि बुलढाणा या जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासासाठीही अत्यंत उपयुक्त ठरेल, असे ठामपणे मांडले. या मार्गामुळे व्यापार, उद्योग, शेतीमाल वाहतूक आणि रोजगाराच्या संधींना चालना मिळणार असून, या मागास भागाच्या विकासाला नवी गती मिळेल, असे त्यांनी सांगितले.

          तसेच, धाराशिव जिल्ह्यातील भूम आणि परंडा तालुक्यातील नागरिकांनी या रेल्वेमार्गासाठी अनेक वर्षांपासून सातत्याने लढा दिला आहे. ‘रेल्वे संघर्ष समिती’च्या माध्यमातून जनतेने वेळोवेळी आंदोलने, निवेदने आणि पाठपुरावा करून ही मागणी जिवंत ठेवली आहे. या भागातील जनभावना अत्यंत तीव्र असून, सरकारने याची गांभीर्याने दखल घ्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले.

          या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने पंढरपूर-शेगाव रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणासाठी तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा व रेल्वेमार्ग मंजूर करावा , सर्वेक्षणाची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करावी  अशी ठाम आणि आक्रमक मागणी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी रेल्वे मंत्र्यांकडे केली.

          तसेच, धाराशिव जिल्ह्यातील भूम आणि परंडा तालुक्यातील ‘रेल्वे संघर्ष समिती’, विविध शेतकरी संघटना आणि स्थानिक नागरिकांनी अनेक वर्षांपासून या रेल्वेमार्गासाठी सातत्याने लढा उभारला असून, वेळोवेळी निवेदने देत आणि पाठपुरावा करत ही मागणी जिवंत ठेवली आहे. या सर्वांनी प्रत्यक्ष भेटीगाठी आणि निवेदनांच्या माध्यमातून हा विषय माझ्याकडे मांडत रेल्वेमार्गासाठी जोरदार मागणी केली होती, अशी माहिती खासदार निंबाळकर यांनी दिली.

          या मागणीमुळे सोलापूर, धाराशिव आणि बुलढाणा जिल्ह्यांतील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रेल्वे प्रश्नाला राष्ट्रीय स्तरावर वाचा फुटली आहे. आता केंद्र सरकार या संदर्भात कोणती ठोस पावले उचलते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

Follow Us Now